- सुनिल बोधनकर
राज ठाकरे यांना अटक होण्याआधीच वातावरण तापवण्याचं काम हिंदी वृत्तवाहिन्यांनी केलं. राज ठाकरेंची अटक म्हणजे या वाहिन्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर महत्वाचा विषय वाटावा इतक्या आक्रमकपणे बातम्या देणं सुरु होतं. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सतत वातावरण तापवण्याचं काम या वाहिन्यांनी केलं. मुंबईतले व्यवहार सुरळीतपणे सुरु होते. मुंबईबाहेर राहणा-यांना मात्र, मुंबईत दंगलसदृष्य परिस्थिती आहे की काय अशी भिती वाटावी, इतपत वातावरण बिघडवण्याचं काम या वाहिन्यांनी केलं. जणु काही राज ठाकरेंना अटक केल्यानंतर मुंबईत राहणारे सगळे उत्तर भारतीय एकदम सुरक्षित होतील, असा आभास निर्माण केला जात होता. या सगळ्या प्रकारात स्वतःला मराठी म्हणवून घेणा-या काही वाहिन्याही सामिल होत्या हे दुर्दैव..
राज यांच्या अटकेनंतर प्रत्येक हिंदी वृत्तवाहीनीवर अटकेचा तमाशा, नाटक वगैरे शब्द वापरून वातावरण आणखीनच भडकावण्याचा प्रयत्न सुरु होता. या वृत्तवाहिन्यांना नेमकं काय हवं होतं, शांतता कि दंगल..? राज यांच्या अटकेच्या वृत्तावरून दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये मिठाई वाटली जात असल्याची दृष्यं वारंवार रंगवून दाखवली जात होती. मात्र, अटकेची बातमी अफवा आहे हे स्पष्ट होईपर्यंत वातावरण बिघडलं होतंच. शांत होऊ शकणारी मुंबई या वृत्तवाहीन्यांच्या गळेकापू टीआरपीसाठी पुन्हा पेटली जाण्याचीच शक्यता अधिक होती. या सगळ्या वृत्तवाहिन्यांची कार्यालयं दिल्ली आणि नोएडाजवळ आहेत, त्यामुळे त्यामुळे त्यांच्या एखाद्या बातमीमुळे इथं किती मोठी दंगल होऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना येणार नाही. या सगळ्या वृत्तवाहिन्यांना चाप लावण्यासाठी केंद्रानंच दखल घ्यायला हवी, अनन्था आता या वृत्तवाहिन्यांच्या गळेकापू स्पर्धेत सामान्यांचे गळे कापले जायची वेळ येईल..
Wednesday, February 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment