Thursday, February 21, 2008

खांदा राज ठाकरेंचा बंदूक काँग्रेसची..!

राज ठाकरेंना अटक करण्यात राज्य सरकारनं वेळ वाया घालवून त्यांना मोठं केल्याचा आरोप बहुतांश जणांनी केलाय. मात्र, पाहुण्यांच्या हातानं साप मारण्याची काँग्रेसची जुनीच रीत आहे.. राज यांनी परप्रांतियांच्या विरोधात सुर लावल्यानंतर त्यांना रोखण्याऐवजी काँग्रेस सरकारनं बघ्याची भूमिका घेतली. अर्थात या माध्यमातून त्यांनाही त्यांचे काही उद्देश साध्य करायचे होतेच. मुंबईवर परप्रांतियांचे लोंढे आदळताहेत, ही खरीच गोष्ट.. पण त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कायदेशीररित्या काहीच करु शकत नाही हे वास्तव.. नुसते उत्तर भारतीय येत होते तोपर्यंत काँग्रेसला चिंतेचं कारण नव्हतं, मात्र, त्यांच्यासोबत तिथले राजकीय पक्षही राज्यात बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. इथे राज ठाकरे आणि काँग्रेसचे उद्देश अप्रत्यक्षपणे एक होतात. राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाचा जम बसवायचा होता, तर, काँग्रेसला त्यांचा परंपरागत मतदार गमवायचा नव्हता. या सगळ्या खेळीत समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं नसतं तर राज ठाकरेंची खेळी वाया गेली असती, मात्र, उत्तर भारतीयांचे आपणच खरे कैवारी असं दाखवण्याची अहमहीका लागलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलं. खरं पाहता या पक्षांचं राज्यातलं मूल्य कमी आहे, मात्र, राजकारणात मुल्याला नव्हे तर उपद्रव मुल्याला महत्व असते. समाजवादी पक्ष काँग्रेसची मत खाऊन निवडून येऊ शकला नाही तरी काँग्रेसचे उमेदवार पडण्याइतपत त्यांची मजल मुंबईत काही प्रमाणात तरी नक्कीच आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसनं चाप ओढला.. दोन्ही पक्षांचं लक्ष्य व्यवस्थित साध्य झालं.. मात्र, त्यात बळी गेला नाशिकचा सामान्य मराठी माणसाचा..

No comments: